संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

संत एकनाथ महाराज यांचा जन्म आणि बालपण – Birth and childhood of Sant Eknath Maharaj

त्यांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते.

वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा.

संत एकनाथ महाराज जीवनप्रवास – Life Journey of Sant Eknath Maharaj

एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते.

गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

संत एकनाथ महाराज यांना झालेले दत्त दर्शन – Datta Darshan of Sant Eknath Maharaj

भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा समाधि न ये ध्याना… हरली भवचिंता।।

नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की, `श्रीदत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती-स्थिती-लय या तीनही तत्त्वांचे मीलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. दत्तात्रेयांचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी-मुनींना, देवांनासुद्धा श्रीदत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्येसुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की, त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे. शब्दातीत आहे.

दत्त दत्त’ ऐसें लागलें ध्यान। हारपले मन झाले उन्मन। मी-तू’पणाची झाली बोळवण। एका जनार्दनीं श्रीदत्तध्यान।।

नाथांच्या मुखात `दत्त दत्त’ असे पवित्र नाम घुमू लागले. नाथांचे अवघे भान हारपले. सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले. मी-तूं पणाची भावना पूर्णपणे विलयाला गेली. आपले सद्गुरु हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद जाणीव झाली. नाथ दत्तध्यानात पूर्ण विरघळून गेले. दत्तात्रेयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला होता. गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ पैठण मुक्कामी येऊन आजोबा-आजीला भेटले. तेव्हा आजोबा-आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथाचे लग्न विजापूरचे देशस्थ ब्राम्हण सावकाराचे मुलीशी म्हणजेच गिरिजाबाईंशी लावून दिले. गिरिजाबाईंचा स्वभावही एकनाथांसारखा शांत व परोपकारी वृत्तीचा होता. अशा रीतीने एकनाथांनी जरी संसार सुरू केला तरीसुद्धा ते नेहमी ईश्वरमग्नच असत. त्यांचा पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे, स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे, त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या.

हातीं कमंडलु दंड । दत्तमूर्ति ती अखंड ॥१॥ ध्यान लागों माझें मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगी चर्चिली विभूति । ह्रदयीं वसे क्षमा शांति ॥३॥ तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एकाजनार्दनी दत्त । तद्रूप हें झालें चित्त ॥५॥

संत एकनाथ महाराज यांचे भक्तांना उपदेश – To the devotees of Saint Eknath Maharaj preaching

नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला तो असा की, अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरीनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होय. नाथांची शिकवण होती सर्व धर्म, पंथ, जाती-उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानवजातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममाण झाले होते. एक प्रसंग असा घडला, रणरणत्या उन्हात एका हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळ्ल्याने थयथय नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचा आचार होता.

एकनाथ महाराजांचा गुरू शोध व गुरुनिष्ठा – Eknath Maharaj’s search for Guru and devotion to Guru

समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी. नाहीतर ती नुसतीच पोपटपंची व्हायची ही एकनाथांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करुन घेण्याचा ध्यासच एकनाथानं घेतला. आता त्यासाठी गरज होती तशा समर्थ गुरुची! एकनाथानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले. एकदा असाच शिवालयात चिंतन – मनन करीत बसला असताना तिथं आलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथाला “तुला आत्मज्ञान प्राप्त करुन घ्यायचं असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचेकडे जा” असं सांगितलं. नाथाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ईश्वरप्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथानं कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे ५० मैल लांब. पण ७-८ वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस-रात्र, तहान, भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोहोचला.

जनार्दन स्वामीं – Janardhan Swamy

जनार्दन स्वामींची नजर एकनाथाकडं वळताच ती बालमूर्ती स्वामींना साष्टांग दंडवत घातली झाली. पितृवत मायेनं स्वामींनी एकनाथाला उठवून जवळ घेतलं, त्याची विचारपूस केली. आई-वडिलांवर रुसून हा मुलगा पळून आला असेल असाच साऱ्यांचा समज होता परंतु एकनाथानं “चित्ताला अनुताप झाल्यामुळे” आपण आल्याचं सांगितल्यावर स्वामींनासुद्धा गहिवरुन आलं. एकनाथाची ती मुद्रा आणि बोलणं यांनी जनार्दन स्वामींच्या मनात एकनाथाबद्दल पहिल्या भेटीतच मायेचा झरा निर्माण केला. जनार्दनस्वामी हे परम दत्तभक्त. त्यांचा जन्म चाळीसगावचा. रमा व सावित्री या त्यांच्या दोन बायका. देवगिरीच्या परगण्याची जहागिरी त्यांचेकडे होती. जनार्दनस्वामींचा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि कर्तृत्वामुळेच त्यांना हा मान यवनांचं राज्य 5असतानाही मिळाला होता. मात्र सत्ता आणि संपत्ती हातात असतानाही जनार्दनस्वामी जीवनाच्या शाश्वत ध्येयाकडे नजर ठेवूनच प्रत्येक क्षण व्यतीत करत असत. भागवताच्या नवव्या अध्यायात :-

दत्तात्रेय शिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा
तेणे जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कली युगी ॥४३०॥

असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती वरचा होता याची कल्पना येते तर अशा अधिकारी गुरुंकडे तशाच तयारीचा शिष्य येवून दाखल झाला होता. चिकाटी, अभ्यासू वृत्ती, चौकसबुद्धी, सदाचार आणि श्रद्धा या गुणपंचकाच्या बळावर एकनाथानं जनार्दन स्वामींना शिष्यत्व द्यायला भागच पाडलं.

एकनाथाला सद्गुरु सेवेची मुळातच अतिशय आवड. तशी संधी प्राप्त झाल्यामुळे त्याला आता काय करु आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. परमोच्च ध्येयानं झपाटलेल्या आठ वर्षांच्या या मुलाला सद्गुरुंशिवाय आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. काही दिवस आपला गुरुंचा दिनक्रम पाहिल्याबरोबर एकनाथानं त्याला अनुसरुन आपला दिनक्रम ठरवला. जनार्दन स्वामी पहाटे उठत तर एकनाथानं त्याही अगोदर उठावं, वाडा झाडून काढावा, सडा घालावा, स्वामींचं स्नानाचं पाणी काढून द्यावं. संध्येची आणि देवपूजेची तयारी करुन ठेवावी, गंध उगाळून ठेवावं, कपडे धुवून आणावेत, पूजा वगैरे झाल्यावर स्वामी बाहेर जायच्या अगोदर त्यांचे जोडे समोर आणून ठेवावेत, जेवणाच्या वेळी वाढायला मदत करावी, रात्री स्वामींचं अंथरुण घालावं, त्यांच्या पायथ्याशी स्वत:चं अंथरुण टाकून स्वत: झोपी जावं, असा दिनक्रम या बालशिष्यानं बांधून घेतला. या गोष्टी तर रोजच्या झाल्या. पण या व्यतिरिक्त प्रसंगानं येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर देखील एकनाथ झेपावत असे.

एकनाथ महाराजांचे सामर्थ्य – Strength of Eknath Maharaj

पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य रहात होते. सर्व प्राणिमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने ‘दंडवतस्वामी’ म्हणत असत. एकदा ते मार्गाने चालले असतांना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, ”काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का ?” ”त्याच्यातही परमेश्वर आहे”, असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले, तरच शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल, असे सुचवले.

एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ”आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन.” ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे; पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालया समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे, असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. ”’हे देवा, तू आता हा गवताचा घास घे”, असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खावू लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, ”देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी.” तो पाषाणाचा नंदी ताडकन् उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले.

संत एकनाथ मृत्यु फ.ल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य ष्ष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

Related Post

संत नरहरी सोनार (Sant Narahari Sonar)

संत बहिणाबाई – Sant Bahinabai

संत मुक्ताबाई – (sant muktabai)

संत गोरा कुंभार – Sant Gora Kumbhar

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )