
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
श्री क्षेत्र औदुंबर – Shri Kshetra Audumbar
स्थान: भिलवडी स्टेशन पासून ६ कि. मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर आहे.
सत्पुरूष: श्री नरसिंह-सरस्वती यांनी चातुर्मास केला.
स्थानमहात्म्य: श्री ब्रम्हानंद स्वामींनी तप केले. मठ व समाधी औदुंबर येथे आहे. श्री नारायणानंद संन्यास दीक्षा व वास्तव्य.
विशेष: विमल पादुका, औदुंबर.
नरसिंह-सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वऱ्हाडातला; परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे. सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोहोचता येते. तेथे रहाण्या-जेवण्याची व्यवस्था होऊ शकते. शिवाय गावात धर्मशाळाही आहेत.
श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की, लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन १४४१मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले, त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे. भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबराच्या दाट शीतल छायेत नरसिंह्सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले.
या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास श्रीदत्तपादुकांचे दर्शन घ्यावयाचे आहे. हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे.
तुझ्या जळानें मनें आमुची तूं धवळित राही, कृतज्ञभावें तुला वंदिता श्रीकृष्णामाई !
अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करुन आणि शुचिर्भूत होऊन दत्तदर्शनाला जावयाचे. घाटावरून सरळ पादुकांपर्यत जाता येते. हा घाट येथील ब्रम्हानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे.
दत्तचरणांचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागला की, बाजूच्या ओवऱ्यांतून दत्तभक्त गुरूचरित्राचे पारायण करीत असताना दिसतील. दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार मह्त्व आहे. अत्यंत काटेकारपणाने आचारधर्माचे पालन करणाऱ्याला दत्तसाक्षात्कार सुलभ होतो, अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. गोरक्षनाथ, चांगदेवराऊळ, जनार्दनस्वामी, एकनाथ, दासोपंत, निरंजन रघुनाथ इत्यादि थोर दत्तभक्तांची नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपाचरणाचा इतिहास आपणाला नतमस्तक बनवितो.
या ठिकाणी स्वत: नरसिंहसरस्वती चार महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते, त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे. त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते.
मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया – प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते. या औदुंबरांच्या छायेतून मंदिरप्रदक्षिणा करुन, वरच्या ’आजोबा’ वडाखालच्या वाटेने गेले की, ब्रम्हानंदस्वामींचा मठ लागतो. हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबरोबर मेरूशास्त्री नावाचे एक विद्वान गृह्स्थ होते. त्यांनी ब्रम्हानंदांच्या सहाय्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ’ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली.
ब्रम्हानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी भक्त-भाविकांकडून वर्गणी गोळा करुन औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. या ब्रम्हानंद मठातच श्रीवासुदेवानंदसरस्वती (दत्तसंप्रदायातील एक अर्वाचीन सत्पुरूष) यांनी आपल्या जीवनसाधनेची पहिली पावले टाकली होती. पु़ढे या मठात श्रीनारायणानंदतीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहात असत.
औंदुबरक्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. ह्या अत्यंत रमणीय दत्तक्षेत्राला अवश्य भेट द्यावी.
कृष्णातिरीच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या ।। धृ ।।
काष।यांबर घेणाऱ्या । पायी पादुका घालणाऱ्या ।। १ ।।
भस्मोद्धलन करणाऱ्या । दंड कमंडलू घेणाऱ्या ।। २ ।।
स्वभक्त संगे असणाऱ्या । भक्त।भिप्सीत करणाऱ्या ।। ३ ।।
स्मरता दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ।। ४ ।।
औदुंबर या क्षेत्री असे जावे – (Go to the Audumbara)
औदुंबर (सांगली, महाराष्ट्र) : सांगली जिल्ह्यातकृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्रआहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली. ही कथा गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे. याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला, व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील, व त्यावृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखालीगुरुचरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल, त्याभक्ताला माझा आशिर्वाद राहील; असे वचन दिले.
औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे. रेल्वेमार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे, कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते. त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते.
औदुंबर वृक्ष माहात्म (The greatness of the Audumbara tree)
दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबरतळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रूत आहे अनेक पुण्यवृक्ष त्यजून ।काय प्रीती औदुंबरी ?असा प्रश्न विचारल्यावरून एकोणविसाव्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्रीनृसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. हिरण्यकशिपूचा श्री नृसिंहानी वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहीली. त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचे फळ आणले आणि
तये वेळी शीतलार्थ । नखे रोविली औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ।
अशा औदुंबरास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. या वृक्षाचे माहात्म वर्णन करतांना श्री गुरूचरित्रकारांनी म्हटले आहे,
तया समयिं औदुंबरासी देती वर हृषीकेशी । “सदा फळित तूं होसी । ‘कल्पवृक्ष’ तुझे नाम ॥१७॥
जे जन भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं । तुज देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥
जे सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक । फळ प्राप्त होय निके । पापावेगळा होय नर ॥१९॥
वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता । जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥
तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान । अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥
तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥
तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥
जें जें कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥
सदा वसों तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी” । म्हणोनि वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥
ऐसा वृक्ष औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु ।
औदूंबर प्रदक्षिणा चे फायदे (Benefits of Audumbara Pradakshina)
1) नियमित औदूंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते.
2) एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो.
3) औदूंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिहंसरस्वती महाराजांचा वास असतो म्हणुनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
4) बाहेरील बाधा हृदय विकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदूंबर प्रदक्षिणा.
5) औदूंबर हा कल्पवृक्ष आहे श्री मुखातून आलेले जी अडलेली अशक्य कामे ही औदूंबर प्रदक्षणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदूंबराची सेवा करावी.
6) औदूंबराची प्रदक्षिणा कमीत कमी 12 मिनिटे करावीत.