उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रा (Utpanna Ekadashi-Alandi Yatra)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रा – Utpanna Ekadashi-Alandi Yatra

भविष्योत्तर पुराणा प्रमाणे आज एकादशी तिथीचा जन्म झाला एकादशी हि साक्षात विष्णुंची कन्या तिने मूर राक्षसाचा वध केला आजच्या दिवशी उपास करून एकादशी महात्म्य श्रवण केले तर एक हजार एकादशा केल्याचे पुण्य मिळते व वैकुंठ लोकात प्रवेश मिळतो…..

अलं ददाति इति आलंदि । अशी आळंदी शब्दाची फोड आहे… जी पुरे म्हणेपर्यंत देते ती आळंदी ! अहो, भगवान श्री ज्ञानराय तर आहेतच, पण त्यांची पावन आळंदी नगरी देखील ” जो जे वांच्छिल तो ते लाहो । ” हा श्री माउलींचाच अमृत-शब्द गेली साडेसातशे वर्षे पूर्ण करीत आलेली आहे. साक्षात् श्रीभगवंतांचेच अभिन्न स्वरूप असणा-या श्री माउलींसारखेच अगाध व अचाट सामर्थ्य, त्यांचे चिरंतन अस्तित्व लाभल्याने ही लौकिक नगरी देखील सर्वार्थाने अंगोअंगी मिरवत आहे. प्रत्यक्ष श्री माउलींच्या संजीवन समाधीचे अधिष्ठान-माहेर लाभल्यास काय होणार नाही? ज्यांच्या दारातला पिंपळही प्रत्यक्ष सुवर्णाचा आहे, त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री माउलींच्या साम्राज्यात उणेपणाच कायमचा उणावलेला आहे !!

आज कार्तिकी वारी. पहाटे पवमानपंचसूक्ताच्या अभिषेकाने उत्सवास सुरुवात होते… दुपारी श्री माउलींची पालखी नगर परिक्रमेस बाहेर पडते व हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांच्या हजे-या होऊन पालखी सोहळा पुन्हा मंदिरात परत येतो. उद्या द्वादशीला श्री माउलींची रथातून मिरवणूक निघते व गोपाळपु-यातून फिरून परत येते. परवा त्रयोदशीला श्री माउलींचा समाधिउत्सव साजरा होतो. वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे….!

आळंदीचा व तिचे अक्षय अधिष्ठान असलेल्या श्री माउलींचा महिमा गाताना सर्व संत वेडावून जातात… श्रीसंत तुकोबाराय तर श्री माउलींविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याने शपथपूर्वक म्हणतात,

चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू ॥
होतील संतांचिया भेटी। सांगू सुखाचीया गोष्टी ॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर । मुखी म्हणता चुकती फेर ॥
जन्म नाही रे आणिक। तुका म्हणे माझी भाक ॥

अशा या आळंदी क्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे… कारण साक्षात् श्रीपांडुरंगांनीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे की, ” कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची. आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असू ! ” श्रीभगवंतांचे हे अलौकिक माउली-प्रेम पाहून श्री नामदेवराय हर्षोत्फुल्ल होऊन धन्योद्गार काढतात,

धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागीरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळालें तें सांग अलंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हें संत । झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥

” कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्रीज्ञानराज माउलींचे स्मरण, वंदन, पूजन, भजन, नमन, चरित्रगायन व नामस्मरण करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन ! ” असा प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांचाच आशीर्वाद आहे… म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत…..

आळंदी यात्रेनिमित्त आज आपण संत ज्ञानेश्वर व चांगदेवाची एक कथा पाहू…..

१३ व्या शतकात चांगदेव नावाचे महान योगी होवून गेले, त्यांना सर्व योगविद्या प्राप्त होत्या, योगविद्येच्या शक्तीने ते चौदाशे वर्ष जिवंत होते, त्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला होता, चांगदेवाना जेव्हा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाबद्दल व चमत्काराबद्दल समजले, तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायला घेतले पण ज्ञानेश्वर फक्त १५ वयाचे असल्याने त्याना चीरंजीव लिहावे का त्यांचे ज्ञान खूप मोठे म्हणून त्यांना तीर्थरूप लिहावे, हे न समजल्याने त्यांनी आपल्या दूताकरवी एक कोरा कागद संदेश म्हणून ज्ञानेश्वरांना पाठवला… कोरा कागद बघून मुक्ताई म्हणाली एवढी तपश्च्चर्या करून चांगदेव कोरा तो कोराच राहिला, त्या कागदावर वेदातील पासष्ट ओव्या लिहून ज्ञानेश्वरांनी तो कागद चांगदेवाला परत पाठवला. ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ते ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय…..

चांगदेवाला राग आला. आपले योगसामर्थ्य दाखवण्यासाठी शिष्यसमुदाय बरोबर घेतला व स्वत एका वाघावर बसून हातात विषारी नागाचा चाबूक घेवून हजारो लोकांसोबत मिरवणुकीने ज्ञानेश्वरांना भेटायला निघाला… मिरवणूक आळंदी गावात शिरली ज्ञानेश्वरांना हि वार्ता समजली तेव्हा ते आपल्या भावंडासोबत झोपडीच्या पडक्या भिंतीवर बसले होते. चांगदेवाच्या स्वागतासाठी त्यांनी निर्जीव भिंतीत चैतन्य निर्माण करून तिलाच आपले वाहन बनवले, व भावंडासह उडत्या भिंतीवरून चांगदेवाच्या स्वागताला निघाले. ते दृश्य पाहून चांगदेवाचा अहंकार नष्ट झाला व तो ज्ञानेश्वरांचा भक्त बनले.
हि भिंत आजही आळंदीला पाहायला मिळते…..

ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥
मज पामरासीं काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥
ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे । इतर तुळणें काय पुढे ॥३॥
तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं । ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत… ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२९६ साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० (की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते…..

आळंदी मंदिर – Alandi Temple

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे… संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे…..

इतिहास – History

चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते… त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे…..

आळंदी माहात्म्य – Alandi Mahatmya

आळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन माहात्म्ये आहेत… मात्र, ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही…..

स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे… १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते…..

‘अलका माहात्म्य’ नावाचे दुसरे हस्तलिखितही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे… यामध्ये ४६ पाने असून संतकवी बालमुकुंद केसरी या ग्रंथाचे लेखक आहेत. एकूण श्लोकसंख्या १३३ असून यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन- अलकावति-अलका या नावाने आहे. तर, इंद्रायणी नदीचा ‘कौबेरास्य महानदी’ म्हणजे कुबेरगंगा असा उल्लेख आहे. हे संतकवी १६ व्या शतकातील असावेत…..

‘ज्ञानलीलामृत’ हा कवी सदाशिव यांनी आळंदी माहात्म्य कथन करणारा मराठी ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे… हे हस्तलिखित आळंदीकरांनी ‘बापरखुमादेवीवरू’ मासिकाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते. त्यातील बराचसा भाग मासिकातून क्रमश: प्रसिद्धही झाला होता. मात्र तो ग्रंथरूपात आलेला नाही. या ग्रंथाचे संक्षिप्‍त रूपांतर चित्रशाळा प्रेसने नोव्हेंबर १९६५ मध्ये प्रसिद्ध केले होते…..

उत्पत्ती एकादशीचे व्रत हे भगवान विष्णुंना समर्पित केलं जातं… या दिवशी भगवान विष्णुची विशेष उपासना केली जाते. विधी पूर्वत या व्रताला केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असा समज आहे. या व्रताचा विधी केल्यानं दांपत्यांच्या जीवनात आलेल्या अडचणींचा नाश होतो आणि घरातील नकारात्मक उर्जादेखील संपूण जाते. त्यामुळे घरात समृध्दी नांदते, लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार, भय यापासून मुक्ती मिळते असंही मानलं जातं…..

जे श्रद्धाळू एकादशीचा उपास करत नाहीत परंतु उपास करण्याचा नेम धरतील तर त्यांनी कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशी पासून त्यास सुरवात करावी, कारण ह्याच एकादशी पासून ह्या व्रतास प्रारंभ होत असल्याचे मानण्यात येते…..

पूजेच्या अथवा आरतीच्या समाप्तीनंतर देवाला अर्पण करायच्या नैवेद्याचे ताट कसे भरावे | भोजना साठी जेवणाचे ताट कसे भरावे । भोजना नंतर विडा खाण्याची पद्धत ।

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )